औंढा (नागनाथ) ज्योतिर्लींग बाबत थोडक्यात…आजचा साक्षीदार| Sakshidar
आजचा साक्षीदार| Sakshidar : हिंगोली जिल्ह्यातील औंढा (नागनाथ) हे तालुक्याचे ठिकाण असून हे हिंगोली शहरापासून 24 कि.मी. , परभणी शहरापासून 55 कि.मी. तर नांदेड शहरापासून 60 कि.मी. अंतरावर आहे. औंढा या गावचे प्राचीन नाव आमईकपूर असे होते. तसेच दारुकावन या नावानेही ओळखले जाते. हे गाव प्राचीनकाळी तीर्थक्षेत्र व वैभवशाली नगर म्हणून ओळखले जात असे. येथील नागनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लींगापैकी एक आहे.

या नागनाथ मंदिराची लांबी 289 फूट तर रुंदी 190 फूट आहे. मुख्य मंदिर 126 फूट लांबीचे तर 118 फूट रुंदीचे आहे. मंदिरात अर्धमंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असून मंडपाची लांबी 40 फूट आणि रुंदी 40 फूट आहे. अंतराळ व गर्भगृहाची व्याप्ती ही 25 फूट लांब तर 22.5 फूट रुंद आहे. मंदिरातील मध्य मंडप वर्तुळाकार असून तो आठ खांबानी तोलून धरलेला आहे. मंडपात आठ कोरीव नक्षीकाम केलेले खांब आहेत. खांब अष्टकोनी व कलाकुसरीचे आहेत. त्यावरील छत हे गोल घुमटाकार आहे.

मंदीराच्या बाहेरील भिंतीवर भरपूर शिल्प आहेत. त्याची संख्या जवळपास एकूण तीन हजार एक इतकी आहे. या शिल्पामध्ये हत्ती, घोडे,मल्ल, प्रणयक्रीडा, राणी, सारथी, योध्द,स्त्री, पुरुष देवता, लक्ष्मी, पार्वती, नटराज, शंकर, श्रीकृष्ण, विष्णू, गणपती, अर्धनारी नटेश्वर, इत्यादी आहेत. यामध्ये काही शिल्प हे आपले लक्ष वेधून घेणारे व महत्वाचे आहेत.
- विष्णुच्या दशावताराचे सुंदर शिल्प
- शंकर-पार्वती कैलास पर्वतावर बसलेले असून रावण तो पर्वत हलविण्याचा प्रयत्न करीत असता तो प्रसंग
- अर्धनटेश्वराचे शिल्प ज्यामह्द्ये अर्धाभाग शंकराचा व अर्धाभाग पार्वतीच्या शरिराचा आहे.
- नटराज तांडव नृत्य करीत आहे.
- एका शिल्पात एका व्यक्तीस तिन तोंडे व चार पाय असून यामधील कोणतीही एक बाजु झाकल्यास एका व्यक्तीची पूर्णाकृती दिसते.
औंढा येथील शिवलिंग गर्भगृहात पाय-याने उतरावे लागते. यावनी शक्ती पासून मुतीचे संरक्षण करण्याकरीता केलेले व्यवस्था आहे. मंदीराची बांधणी हेमाडपंथी असून मंदीराभोवती 20 फूट उंचीचा तट आहे. व मंदीराला चार प्रवेशद्वार आहेत. मंदीराच्या आत व बाहेर अनेक शिल्पतट आहेत.
मुख्यमंदीराला तिन प्रवेशद्वार असून त्यावर शिवाची विविध रुपे कोरलेली आहेत. या मंदिराचे वैशिष्टे म्हणजे गाभा-यातील दुषीत हवा बाहेर काढण्याची सोय कलाकारानेच केलेली आहे. आज जे मंदीर दिसते त्याचा पांढरा भाग हा अहिल्यादेवी होळकराने मंदीराचा जिर्णोदार केलेला भाग आहे.

या मंदिराच्या शिल्पकलेची वेरुळ व अजिंठा येथील शिल्पकलेची तुलना करुन काही इतिहासकारांनी या मंदिराच्या बांधणीचा संबंध वाकाटक व राष्ट्रकूट घराण्याशी व त्या कालखंडाशी जोडला. परंतु चिकित्सक पध्दतीने अभ्यास केल्यास हे मंदीर हेमाडपंथी असलेले दिसते. तसेच 1294 मध्ये येथे कनकेश्वरी मंदीराजवळ राजा रामदेवराय यांचा शिलालेख सापडला असून त्याने मंदीरास दोन दिल्याचा उल्लेख सापडतो. म्हणून मंदीराचा कालखंड हा 11 वे 12 शतक मानला जातो. या मंदीरात श्रावण सोमवार, पाडवा तसेच महाशिवरात्र निमित्ताने मोठी यात्रा भरते यात्रेच्या पाचव्या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो.
पांडावातील धर्मराजाने हे मंदीर बांधले, महाराष्ट्रातील संत नामदेव व त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची प्रथम भेट या मंदीरात झाली. अहिल्याबाई होळकरांनी मंदिराचा जिर्णोदार केला. पूर्वी या स्थानाला आमर्दक असे म्हणत असत या मंदीरातील नागनाथाची प्राणप्रतिष्ठा धर्मराजाने केली असल्याचा उल्लेख कावेरीखंड पद्मपुरानात आहे. तर येथील चैत्यालयाची स्थापना राष्ट्रकूट काळात झाली असल्याचा उल्लेख खोंटीग राष्ट्रकूट याच्या शके 893 मधील ताम्रपटात आहे.

औढा येथे अनेक तीर्थ आहेत. त्यात हरिहर नावाचे तिर्थ संपूर्ण दगडी बांधकामाचा असून त्यावर एकाच वेळी अनेक भावीक स्नान करु शकतात. काही पंडीतांच्या मते येथे साडेतीन पीठापैकी तीन पीठांची स्थाने आहेत. त्यापैकी नेऋत्य दिशेला महोरथी जगदंबा(स्थानिक नाव खांडेश्वरी), दुसरी अग्नेयेस भवानी (स्थानिक नाव कनकेश्वरी)आणि तिसरी महालक्ष्मी (स्थानिक नाव पद्मावती) पश्चिमेस 1 किमी आहे.