गणेशोत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे – जिल्हाधिकारी

नंदुरबार, दि.27 : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. यंदा शासनाने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याने सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आमदार राजेश पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे, तहसिलदार मिलींद कुळकर्णी, मंदार कुळकर्णी, भाऊसाहेब थोरात यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

गणेशोत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे –
जिल्हाधिकारी मनीषा खत्री

श्रीमती खत्री म्हणाल्या की, यंदाचा गणेशोत्सव साजरा करतांना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम, आरोग्य शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. वीज वितरण कंपनीने उत्सवकाळात अंखड वीज पुरवठा सुरु राहील याची दक्षता घ्यावी. मिरवणुक दरम्यानचे रस्त्यावर खड्डे पडले असतील त्याठिकाणी भराव करुन दुरुस्तीची कामे करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

आमदार पाडवी म्हणाले की, गणेश मंडळ आयोजकांनी सण उत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे, गणेश मंडळ स्वंयसेवकांनी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवाच्या मिरवणूका काढाव्यात, मिरवणूका काढतांना वेळेच्या बंधनाचे पालन करावे. मिरवणुकीत अडथळा येणाऱ्या वायर, केबल बाजुला करण्यात येवून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. पाटील म्हणाले, सर्व मंडळांना विविध स्वरुपाच्या परवानगीसाठी पोलीस विभागाकडून एक खिडकी योजना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात उपलब्ध करुन दिली असून मंडळांनी नियमानुसार परवानगी प्राप्त करुन घ्यावी. गणेशोत्सवा मधील नागरिकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी गणेशोत्सव काळात हेल्पलाईन सुरु करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या मार्गदशक सुचनांचे पालन करुन शांततामय वातावरणात उत्सव साजरा होण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment