मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
वर्धा, दि. 21 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्याला 220 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून शेतक-यांना शेततळ्यासाठी कमाल 75 हजार रुपयाच्या मर्यादेत शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
शेतक-यांनी महाडीबीटी प्रणालीवरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरल्यावर लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांच्या निवडीची कार्यवाही सिस्टिमव्दारे करण्यात येईल. योजनेंतर्गत जिल्ह्यातील 29 शेतक-यांची निवड देखील पहिल्या लॉटरीने झालेली आहे. मात्र अद्यापही सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या शेततळ्याकरीता प्राप्त अर्जाची संख्या अत्यल्प आहे.
योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्याच्या इनलेट आऊटलेटसह आणि इनलेट आऊटलेट विरहित या दोनच उपघटकाकरीता अनुदान देण्यात येणार आहे.
मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांनी दोन उपघटकाव्यतिरिक्त वैयक्तिक शेततळ्यांचे इतर उपघटक अंतर्गत देखील अर्ज केलेले आहे, अशा सर्व शेतक-यांनी योजनेचाल लाभ घेण्यासाठी पुनश्च अर्ज प्रक्रिया करावी. याकरीता महाडीबीटीवर लॉगीन केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा या टाईल अंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी. यानंतर इनलेट आणि आऊटलेटसह किंवा इनलेट आणि आऊटलेट शिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. त्यानंतर शेततळ्याचे आकारमान आणि स्लोप निवडण्यात यावा तसेच इतर आवश्यक माहिती भरुन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी कळविले आहे.