रेशीम रोपवाटीका तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न । शाश्वत रेशीम उद्योगासाठी महिलांचा सहभाग आवश्यक – कृषिरत्न विजयअण्णा बोराडे
जालना,दि. १९ जानेवारी (आजचा साक्षीदार) : बदलत्या हवामानामध्ये रेशीम शेती शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देऊ शकते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्वरित तूती रोपे तयार करण्यास सुरुवात करावी. याकरिता रेशीम उद्योगाच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणामध्ये महिलांची उपस्थिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तरी शाश्वत रेशीम उद्योग यशस्वी करण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे जिल्हा रेशीम कार्यालय व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना यांचे संयुक्त विद्यामाने “तुती रोपवाटिका लागवड पूर्व प्रशिक्षण” कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमात 2023- 24 मध्ये नवीन तुती लागवड नोंदणी केलेले 550 शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालय औरंगाबादचे उपसंचालक दिलीप हाके, कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक कृषिरत्न विजयअण्णा बोराडे, नागपूर रेशीम संचालनालयाच्या लेखा अधिकारी शुभदा चिंचोळकर, कृषी विज्ञान केंद्रचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्रीकृष्ण सोनुने, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, तसेच मराठवाडा विभागातील सर्व रेशीम विकास अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना तुती रोपांची आवश्यकता असते ती रोपे सहजासहजी सर्वत्र विक्री करिता उपलब्ध होत नाहीत याकरिता जून 2023 मध्ये तूती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जानेवारीमध्येच आपल्या शेतामध्ये वैयक्तिक रोपवाटिका तयार करणे आवश्यक आहे. याकरिता शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने तुती नर्सरी करण्याचे तंत्रज्ञान व प्रात्यक्षिक, उपस्थित शेतकऱ्यांना दाखवण्यात आले या प्रसंगी अजय मोहिते रेशीम विकास अधिकारी यांनी तुती नर्सरी तंत्रज्ञान बाबत सादरीकरण व प्रात्यक्षिक दाखवले, उपसंचालक दिलीप हाके यांनी वेळेत तुती रोपे तयार करण्याची आवश्यकता व फायदे तसेच शासनाच्या योजना विषयी माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सन 2023-24 च्या लागवड हंगामामध्ये जालना जिल्ह्यात 1000.00 एकर क्षेत्रात तुती लागवड करण्याचा लक्षांक दिला आहे. त्यांनी सूचना केल्यानुसार जालना जिल्ह्यात 1037 एकर क्षेत्रात नवीन तुती लागवडीकरिता जिल्हा रेशीम कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 15 वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी शेतकऱ्यांना रेशीम उद्योग या विषयावर प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करते. चालू वर्षामध्ये महा रेशीम अभियानामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यास सहकार्य केले.
कार्यक्रमास महिको अंडी पूज निर्मिती केंद्राचे प्रमुख मार्गदर्शक शास्त्रज्ञ डॉ. सोमी रेडी यांनी रेशीम अंडी पुंज निर्मिती व वाटप विषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राचे मृद्शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती पद्धती याबाबत व तसेच याचा रेशीम शेतीमध्ये कसा उपयोग करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये रेशीम तुती रोपवाटिका तयार करणे तंत्रज्ञान घडी पत्रिकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी केले तर आभार औरंगाबादचे रेशीम विकास अधिकारी बी.डी. डेंगळे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.