वसतिगृह सुरु करू इच्छिणाऱ्या संस्थांना संपर्क साधण्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचे आवाहन
सातारा, दि. १४ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार या प्रवर्गातील 100 मुले व 100 मुली या प्रमाणे एकूण दोन वसतिगृहे सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करावयाची आहेत.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रति विद्यार्थी/विद्यार्थींनींना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनामार्फत वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. ज्या स्वयंसेवी संस्था वसतिगृहे सुरु करण्यास इच्छुक असतील, अशा संस्थांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलानजिक, सातारा येथे संपर्क करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.