शिर्डी, दि. ५ :- विमानतळ आणि लगतच्या परिसरातील सुरक्षेला प्राधान्य देत भविष्यातील गरजा लक्षात घेऊन समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्या वतीने शिर्डी येथील विमानतळ आणि परिसराचे व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे पार पडली. बैठकीत विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. या बैठकीला शिर्डी विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव, विमानतळ संचालक, ऐअरसाईड मॅनेजर रोहित रेहपाडे, विमानतळ अभियंता निलेश डांगे, स्पाय जेटचे मॅनेजर आर.चोक्कालिंगम, इंडिगो एअरलाईन्सचे स्टेशन मॅनेजर आशिष अब्राहम, विमानतळ परिचालन व सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ.एस.के.तुंबारे, राहाताचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, कोपरगावचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, संगमनेरचे गट विकास अधिकारी अनिल नागणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सी.एन.शिंदे उपस्थित होते.
विमानतळ आणि लगतच्या परिसरातील समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नियोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
विमानतळ परिसर व्यवस्थापन सुकर व्हावे यासाठी विमानतळ प्रशासन, नगर पंचायत, जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने ताळमेळ ठेवून विविध कामे पार पाडावी अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली. परिसरातील बांधकामांना प्रतिबंध करण्यासाठी नोडल अधिकार्याची नियुक्ती करणे, भटकी कुत्री आणि पक्षांचा बंदोबस्त करणे, संरक्षक भिंती उभारणे, वेस्ट मॅनेजमेंट तसेच विमानांसाठी नाईट लँडींग सुविधा कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतला.
विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी मागील बैठकीतील ठराव व विमानतळ प्रशासनाने केलेल्या कामांचे सादरीकरण केले.