सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन
कोल्हापूर, दि. २२ जानेवारी (आजचा साक्षीदार) : महिला आर्थिक विकास महामंडळ, नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटातील महिलांकरिता ‘सकस आहार तिरंगा थाळी’ स्पर्धेचे उद्घाटन बाळकृष्ण हवेली येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या आहार तज्ज्ञ सारिका आवटी, शिवाजी विद्यापीठातील फूड टेक्नॉलॉजी विभागाचे डॉ. एस .एम लोखंडे, विभागीय संनियत्रंण व मूल्यमापन अधिकारी विलास बच्चे, शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे समुपदेशक मकरंद चौधरी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा समन्वय अधिकारी श्री. कांबळे म्हणाले, माविम कोल्हापूर अंतर्गत बचत गटातील महिलांची तालुका पातळीवर पाहिल्यांदा सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धा घेण्यात आली आहे. महिलांनी स्वत:साठी व आपल्या कुटुंबाकरिता सकस आहाराचा वापर करावा जेणेकरुन महिलांचे आरोग्य चांगले राहील, त्यांना कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागू नये. तसेच कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिन साजरा करावयाचा असल्याने तृणधान्याचा वापर करुन महिलांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा.
विभागीय सनियत्रण व मूल्यमापन अधिकारी श्री. बच्चे म्हणाले, महिलांनी आपल्या आरोग्याकरिता नेहमी सकस आहाराचा वापर करावा. बचत गटातील महिलांनी अशा प्रकारचे कार्यक्रम गावपातळीवर आयोजित करुन सकस आहाराबाबत जनजागृती करण्यात यावी.
डॉ. एस. एम. लोखंडे म्हणाले, महिलांना आरोग्य व सकस आहारा बाबत माहिती होण्यासाठी अशाप्रकारचे कार्यक्रम नियमित आयोजित करावेत. यामुळे महिलांना रोजच्या आहारात कोणते पदार्थ वापरावे, याची माहिती मिळण्यास मदत होईल. महिलांनी नियमित व ताजा आहार घ्यावा, असे मत डॉ.लोखंडे यांनी व्यक्त केले.
छत्रपती शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या आहार तज्ज्ञ सारिका आवटी म्हणाल्या, महिला नेहमी आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी करतात पण आपल्या आहाराकडे लक्ष देत नाहीत. महिला या दिवसभर काम करताना दिसतात परंतु, त्यामानाने आहार घेत नाहीत. परिणामी शरीरावर परिणाम होतो जसे हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा जाणवणे या सर्व कारणांसाठी महिलांनी ताज्या व सकस आहाराचे सेवन करावे. महिलांनी आहाराकरिता डायट चार्ट तयार करावा ज्यामुळे रोजच्या आहारात प्रोटीन मिळेल. महिलांनी आपल्या सौंदर्याकरिता कृत्रिम साधनांचा वापर करावा, जेणेकरून चेहऱ्यावर व त्वचेवर परिणाम होणार नाही, असेही श्रीमती आवटी यांनी सांगितले.
जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेल्या महिलांना सर्व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. आभार विनायक कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास माविम मधील कर्मचारी, सी.एम.आर.सी. मधील व्यवस्थापक व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.