स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन
वर्धा दि. १५ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाङमय निर्मितीसाठी वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रवेशिका दिनांक 31 जानेवारी पर्यंत स्विकारण्यात येतील.
दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रभादेवी, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर देखिल प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध आहेत.
प्रवेशिका पूर्णत: भरून आवश्यक साहित्यासह जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे दिनांक 31 जानेवारी पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावे,असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. लेखक/ प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठवितांना बंद पाकीटावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर प्राप्त प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.
जिल्ह्यातील लेखक व प्रकाशकांना या योजनेतंर्गत प्रवेशिका सादर करणे सुलभ व्हावे यासाठी स्पर्धेसाठीची माहिती पुस्तिका व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखेत उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.