निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करण्याचे आवाहन
वर्धा दि.१६ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – जिल्ह्यात डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या 113 ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये निवडणूक लढविलेल्या 2 हजार उमेदवारांनी आपल्या निवडणूक काळातील खर्चाचा हिशोब दि.20 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूकचे प्रभारी अधिकारी यांनी केले आहे.
निर्धारित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न करणा-या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाचे दि.3 ऑगस्ट 2016 चे आदेश व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 14 (ब) नुसार आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरीता निवडणूक लढविण्यासाठी अनर्ह ठरविण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह हिशोब जमा करणे आवश्यक आहे.
खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणा-या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरु करण्यात येणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये निवडणूक झालेल्या 113 ग्रामपंचायती, 113 सरपंच, सदस्यांच्या एकुण जागा 958, एकुण उमेदवार 2 हजार, बिनविरोध उमेदवार 165, निवडणूक लढविलेले उमेदवार 1 हजार 835 असे होते. खर्चाचा हिशोब देण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी असुन उमेदवारांनी नमुद दिनांकापर्यंत खर्चाचा हिशोब सादर करावा, असे ग्रामपंचायत निवडणूक शाखेने कळविले आहे.