वर्धा, दि.03 : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांनी खचून न जाता शेतीशी निगडीत विविध जोडधंदे करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिका-यांची नैसर्गिक शेती कार्यशाळेस भेट
कृषि विज्ञान केंद्र, सेलसुराच्यावतीने नैसर्गिक शेती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे, तहसीलदार रमेश कोळपे, उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात हळद उत्पादन मुख्यत: सेंद्रिय पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी वायगाव हळदीची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करावी, त्याबरोबरच शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत काळानुरूप बदल करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी पुढे म्हणाले. पिकांची लागवड ही रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी, उद्यमशिलतेवर भर द्यावा. सेंद्रिय पद्धतीने फळपिके व भाजीपाला पिके घ्यावी. रबी हंगामामध्ये तेलबिया पिकांची लागवड, पडलेल्या पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी जलसंधारण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंम्बासे यांनी आपल्या शेती बरोबरच अधिक उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून पशुपालन, दुग्धव्यवसाय यासारखे जोडधंदे सोबतच चारापिके लावण्यावर भर द्यावा, असे सांगितले. डॉ.जीवन कतोरे यांनी नैसर्गिक शेती करण्यामागील उद्दिष्टे व महत्व शेतक-यांसमोर विषद केले. सध्याची जिल्ह्यामधील पावसाची तसेच खरीप पिकांची एकूण परिस्थिती बघता बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.