कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
सातारा (आजचा साक्षीदार) दि. 30: कृषी यांत्रिकीकरणात सध्याच्या सोडत पध्दत (लॉटरी) किंवा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पध्दतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अभिप्राय मागविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेत शेतकऱ्यांना सोडत पद्धतीत महाडीबीटीमहाआयटी या संकेतस्थळावर कधीही अर्ज करता येतो. आलेल्या अर्जांमधून निघणाऱ्या लॉटरीमधून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते. कृषी यांत्रिकीकरणात सध्याची सोडत पद्धत योग्य आहे का यावर होय किंवा नाही असे योग्य ते उत्तर देणे अपेक्षित आहे. तसेच या व्यतिरिक्त सोडत पध्दत ही “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” यापैकी कोणती सोडत पद्धत प्राधान्यांनी राबवावी या बाबतचा अभिप्राय घेतला जाणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला अभिप्राय गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे नोंदवावेत.